मित्र...सर्वांच्याच आयुष्यातील अविभाज्य गोष्ट! गरजच म्हणा ना. या पृथ्वीतलावर एकही माणूस असा नसेल की ज्याला मित्र नाही आहेत. आणि चुकूनमाखून एखादा असा मिळालाच की ज्याला खरोखरच कोणी जिवलग मित्र नाही आहे, तर तो बिचारा दुर्दैवीच समजावा.
पण खरा मित्र हा नक्कीच दुर्मिळ असतो. खरा मित्र म्हणजे देवाने दिलेलं वरदानच. मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजतो की मी माझ्या आयुष्यात अनेक चांगल्या लोकांच्या सहवासात आलो. भरपूर मित्र मिळाले...काही जिवाला जीव देणारे मित्रही मिळाले.
जसजसा मोठा होत गेलो, जसजशी समज वाढत गेली, तसा मी खरे मित्र आणि कामसाधू माणसे ह्यांच्यातला फरकही समजू लागलो. गरजेपूर्त, काम होईपर्यंत वाहवा करणारी माणसे ओळखू लागलो. अशा माणसांपासून शक्य होईल तितक्या दूर राहण्याचा मी प्रयत्न करतो.
मला माहीत आहे की मी खरं लिहितो आहे, पण हे सर्व कसं मांडू तेच समजत नाही आहे. थोडक्यात सांगू शकेन की मी सध्या तुमच्यापासून दूर असल्याने तुम्हाला प्रचंड मिस् करतोय!